मुंबई | 6 ऑगस्ट 2025
मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका वाहतूक व्यवस्थेला बसला असून, त्यातच मोनोरेल सेवेत मोठी अडचण निर्माण झाली. चेंबूर ते भक्ती मार्ग दरम्यान मोनोरेल अचानक तांत्रिक कारणामुळे थांबली आणि तब्बल 2 तास प्रवासी अडकून पडले. यामुळे प्रवाशांची अक्षरशः भीषण अवस्था झाली.
अडकलेले प्रवासी घाबरले
संध्याकाळी सव्वा सहा वाजता मोनोरेल थांबली. थांबल्यानंतर लगेचच गाडीतील एसी बंद झाला आणि आतून घामाघूम झालेल्या प्रवाशांचा श्वास कोंडला. गर्दीमुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली. प्रवाशांनी काचांवर आपटून मदतीचे संकेत दिले.
अंधारात भरकटलेली परिस्थिती
वीजपुरवठा खंडित झाल्याने गाडीत अंधार पसरला. घाबरलेल्या प्रवाशांनी दरवाजे आतून उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. श्वास अधिकच गुदमरू लागल्यानं प्रवाशांनी मोनोरेलच्या काचा फोडल्या. त्यानंतर थोडासा दिलासा मिळाला.
बचावकार्याची धडपड
दरम्यान अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मुसळधार पावसामुळे बचावकार्याला अडथळे येत होते, तरीही दोन तासांनी प्रवाशांची सुटका करण्यात यश आले. गाडी खाली उतरवताना प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
प्रवाशांचा संताप
मोनोतून सुटका झाल्यावर अनेक प्रवाशांनी आपली आपबिती सांगितली.
एका प्रवाशाने सांगितले – “संपूर्ण गाडीत गर्दी होती. लोकल बंद असल्याने मोनो पकडली, पण 2 तास अडकलो. श्वास गुदमरला. आता यापुढे कानाला खडा – मोनोमध्ये कधीही प्रवास करणार नाही. जीव गेला असता!”
तर दुसऱ्या प्रवाशाने सांगितले – “लोकल बंद असल्याने मोनो पकडली, पण इथेच अडकलो. एसी बंद झाल्याने जीव घुसमटला. मदत मिळाली खरी, पण परिस्थिती भयानक होती.”
या घटनेने मुंबईकरांच्या मनात मोनोरेल प्रवासाबद्दल भीती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे आधीच विस्कळीत झालेल्या वाहतुकीत मोनोरेलची ही अडचण प्रवाशांसाठी अधिक त्रासदायक ठरली. प्रशासनाने यापुढे अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी काटेकोर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.