संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराडला मोठा झटका; जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला!

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराडला मोठा झटका; जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला!

बीड क्राईम: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराडला मोठा झटका; जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

बीड | 30 ऑगस्ट 2025

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने कराडचा जामीन अर्ज फेटाळला असून त्याचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे.

जामीन अर्ज का फेटाळला गेला?

संतोष देशमुख यांची 2023 मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. वाल्मिक कराड हा या प्रकरणातील क्रमांक एकचा आरोपी आहे. कराडने स्वतःला निर्दोष ठरवून सुटका देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती.

गेल्या दोन महिन्यांपासून या अर्जावर सुनावणी सुरू होती. मात्र, पुरावे आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आज कराडचा अर्ज फेटाळला.

प्रकराणाची पार्श्वभूमी

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे बीडसह संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. इतकेच नव्हे तर हे प्रकरण विधानसभेत देखील गाजले आणि त्यानंतर आमदार धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

फरार आरोपीबाबत प्रश्नचिन्ह

दिवंगत सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की,
“या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. पोलिसांना त्याचा काहीही मागोवा लागलेला नाही. आम्ही सतत चौकशी करत असलो तरी त्याचा थांगपत्ता लागत नाही, हे चिंताजनक आहे.”

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, तपास यंत्रणेने या फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी अधिक गांभीर्याने प्रयत्न करण्याची गरज आहे.

वाल्मिक कराडच्या वकिलांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या प्रकरणाचा कायदेशीर लढा अधिक तीव्र होणार आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे पीडित कुटुंबाला थोडासा न्याय मिळाल्याची भावना आहे. तरीही फरार आरोपीबाबत तपासाची गती मंद असल्याने या प्रकरणावरून प्रश्न उपस्थित होत आहेत. राज्यभर गाजलेल्या या प्रकरणात पुढील न्यायालयीन निर्णय आणि तपासाची दिशा काय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *