पितृपक्षातील विधी दक्षिणेला का करतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा आणि महत्व
हिंदू धर्मात कोणतेही शुभकार्य करताना दिशा, तिथी, वार, आणि मुहूर्ताला विशेष महत्त्व दिले जाते. पूर्व, पश्चिम व उत्तर दिशा या शुभ मानल्या जातात. मात्र दक्षिण दिशा ही अशुभ मानली जाते. लग्न, गृहप्रवेश, पूजा यांसारखी शुभ कार्ये या दिशेला न करता येत नाहीत. परंतु पितृपक्षाच्या काळात मात्र सर्व विधी दक्षिण दिशेला केले जातात. यामागे खोल अर्थ दडलेला आहे. चला पाहुयात पौराणिक कथा आणि श्रद्धेतील महत्त्व.
दक्षिण दिशा यमाची मानली जाते
पौराणिक कथेनुसार प्रत्येक दिशेला एक क्षेत्रपाल असतो. दक्षिण दिशेचा क्षेत्रपाल म्हणजे यमराज. मृत्यूनंतर आत्मा यमाच्या द्वारातूनच यमलोकात जातो. म्हणूनच या दिशेला मृत्यूचे प्रतीक मानले जाते. मृत्यू ही मानवासाठी भयावह गोष्ट असल्याने दक्षिण दिशेला अनेकदा अशुभ मानले जाते.
महादेवाचे दक्षिणमुखी स्थान
सर्वसाधारणपणे कोणत्याही मंदिराचे दरवाजे दक्षिणेला नसतात. घरातील देवघर व मुख्य दरवाजाही दक्षिण दिशेला ठेवू नयेत असे वास्तुशास्त्र सांगते. मात्र एक अपवाद आहे – भगवान शंकराची पिंडी. शिवलिंगाचे मुख दक्षिणेकडे असते. कारण महादेव हे मृत्यूचे अधिपती मानले गेले आहेत. मृत्यूनंतर आत्मा महादेवाच्या अधीन होतो असेही मानले जाते.
पितृपूजन दक्षिणेला का करतात?
पितृपक्षाच्या काळात आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना स्मरण केले जाते. शास्त्रानुसार पितरांचा निवास दक्षिण दिशेला आहे. यमलोकातून आत्मे पृथ्वीवर येतात आणि दक्षिण दिशेला बसवलेल्या आसनावर त्यांना तर्पण, श्राद्ध आणि अन्नदान केले जाते. त्यामुळे या काळात दक्षिण दिशा ही पवित्र मानली जाते.
दक्षिण दिशेला पाय करून झोपण्यास मनाई का?
ज्यांचा मृत्यू समीप असतो, अशा व्यक्तीला दक्षिणेकडे पाय करून झोपवले जाते. यामुळे आत्मा सहजतेने देह सोडतो आणि मृत्युलोकात प्रवेश करतो असे मानले जाते. म्हणूनच जिवंतपणी दक्षिणेकडे पाय करून झोपण्यास मनाई केली आहे.
दक्षिण दिशा ही मृत्यूचे प्रतीक असून यमराजाचा अधिवास मानली जाते. म्हणून ती शुभ कार्यांसाठी वर्ज्य आहे. परंतु पितृपक्षात आपल्या पूर्वजांचा संबंध याच दिशेशी जोडला गेला असल्याने पितृपूजन दक्षिणेला केले जाते. यामध्ये आपला श्रद्धा, परंपरा आणि पौराणिक कथा यांचा सुंदर संगम दिसतो.