मराठवाड्यात पावसाचा कहर!
रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाडा विभागात पूरस्थिती गंभीर झाली आहे. दोन दिवसांपासून अखंड पाऊस सुरू असल्याने नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये रस्ते, पूल पाण्याखाली गेले असून काही गावांशी संपर्क तुटला आहे. यामुळे ग्रामीण भागात नागरिकांची मोठी हालअपेष्टा होत आहेत.
विशेष म्हणजे जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडल्यामुळे गोदावरी काठच्या सुमारे 50 गावांशी संपर्क तुटला आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, धाराशिव, जालना आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे.
अतिवृष्टीची नोंद – 189 महसूल मंडळ प्रभावित
नुकत्याच मिळालेल्या आकडेवारीनुसार, मराठवाड्यातील तब्बल 189 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदवली गेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 110.3 मिमी पाऊस झाला असून हर्सूल (ता. गंगापूर) येथे तब्बल 196 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्हानिहाय पाहता –
- छत्रपती संभाजीनगर : 68 मंडळात अतिवृष्टी
- बीड : 48 मंडळात अतिवृष्टी
- जालना : 15 मंडळात अतिवृष्टी
- लातूर : 4 मंडळात अतिवृष्टी
- धाराशिव : 7 मंडळात अतिवृष्टी
- नांदेड : 13 मंडळात अतिवृष्टी
- परभणी : 11 मंडळात अतिवृष्टी
- हिंगोली : 11 मंडळात अतिवृष्टी
यामुळे सुमारे 20 लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून जनावरांच्या जीवितहानीचे प्रमाणही वाढले आहे.
जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले
जायकवाडी धरण परिसरात सतत पाऊस पडत असल्यामुळे रविवारी दुपारी धरणाचे नऊ आपत्कालीन दरवाजे आठ फूटापर्यंत उचलून विसर्ग सुरू करण्यात आला.
- गोदावरी नदीपात्रात एकूण 2,26,368 क्युसेक विसर्ग सुरू आहे.
- पैठण शहरातील परदेशीपुरा, कहारवाडा, साठेनगर, लहुजीनगर, संतनगर भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे.
- नवगाव पूल पाण्यात गेल्यामुळे जवळपास 80 गावांचा संपर्क तुटला आहे.
जिल्हानिहाय परिस्थिती
जालना
जालना जिल्ह्यातील राजाटाकळी, मंगरुळ, जोगलादेवी, पाथरवाला, लोणी सावंगी या पाच बंधाऱ्यांतून विसर्ग सुरू झाला आहे. बदनापूर, भोकरदन, मंठा व अंबड तालुक्यात मोठे नुकसान झाले असून जनावरांचे मृत्यू झाले आहेत.
नांदेड
मुदखेड, धर्माबाद, नायगाव आणि देगलूर तालुक्यात पावसामुळे गावोगावी पाणी शिरले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
धाराशिव
भूम व परंडा तालुक्यात पूरस्थिती गंभीर आहे. खामगाव गावात पाणी शिरल्याने घरांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. दलित वस्तीत योग्य सर्वेक्षण न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
हिंगोली
हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीला पूर आला असून कळमनुरी आणि वसमत तालुक्यातील अनेक गावात पाणी शिरले आहे. कुरुंदा गावात पूरामुळे मोठे नुकसान झाले आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून 22 हजार क्युसेक, येलदरी प्रकल्पातून 32 हजार 180 क्युसेक, आणि सिद्धेश्वर प्रकल्पातून 25 हजार 638 क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गावोगावी सतर्कता वाढवण्यात आली आहे.
मराठवाड्यातील पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. शेती, पशुधन, रस्ते, पूल आणि घरे यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत आणखी पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.