राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं असलं, तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निकाल अपेक्षेपेक्षा कमी लागल्याचं चित्र आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिवसेनेनेही चांगली कामगिरी केली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 36 जागांवर समाधान मानावं लागलं, त्यामुळे पक्ष तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे.
या निकालानंतर पत्रकारांनी थेट प्रश्न विचारताच अजित पवारांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. “आम्ही या निवडणुकीत मुद्दाम कमी जागा लढवल्या होत्या. प्रचारासाठी मला फारसा वेळ मिळाला नाही. तरीदेखील मी एका दिवसात सात-सात सभा घेतल्या,” असं सांगत त्यांनी निकालावर नाराजी नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच, पक्षाला अजून अधिक संघटनात्मक काम करण्याची गरज असल्याचंही त्यांनी मान्य केलं.
नगर परिषद निकालांइतकाच चर्चेचा विषय ठरलेला मुद्दा म्हणजे पालकमंत्रीपदाचा तिढा. रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, याचा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्री यांच्याकडे आहे. “पालकमंत्री नसेल तरी विकासकामं थांबलेली नाहीत. कुंभमेळ्याची तयारी आणि निधीवाटप सुरळीत सुरू आहे,” असं स्पष्ट करत त्यांनी कोणताही वाद नसल्याचा संदेश दिला.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत युती करणार का, हा प्रश्न सर्वाधिक चर्चेत आहे. या प्रश्नावर अजित पवारांनी थेट उत्तर न देता “आज रात्री विचार करून सांगतो,” असं मिश्किल विधान केलं. या एका वाक्यामुळे राजकीय चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.
महायुतीमध्ये सत्तेत असतानाही अनेक ठिकाणी मित्रपक्ष एकमेकांविरोधात उभे राहिले, ही वस्तुस्थिती असल्याचं अजित पवारांनी मान्य केलं. मात्र प्रचार करताना तारतम्य ठेवण्यात आल्याचं ते म्हणाले. कार्यकर्त्यांना संधी मिळणं महत्त्वाचं असल्यामुळे काही ठिकाणी वेगवेगळे निर्णय घ्यावे लागले, असंही त्यांनी सांगितलं.
पुणे जिल्ह्याबाबत बोलताना अजित पवार भावनिक झाले. “गेल्या 35 वर्षांत पुणे जिल्ह्याने मला नेहमी साथ दिली आहे. यावेळीही मतदारांनी विश्वास दाखवला,” असं सांगत त्यांनी मतदारांचे आभार मानले. तसेच, राज्यातील सर्व 288 निवडून आलेल्या नगराध्यक्षांचे अभिनंदन करत त्यांनी पुढील राजकीय वाटचालीचे संकेत दिले.
एकूणच, नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर गेली असली, तरी अजित पवारांच्या वक्तव्यांवरून स्पष्ट होतं की हा शेवट नाही, तर पुढील मोठ्या राजकीय खेळीची सुरुवात असू शकते. महापालिका निवडणुकांआधी येणारे निर्णय राज्याच्या राजकारणाला नवं वळण देऊ शकतात.