नवी दिल्ली | 11 सप्टेंबर 2025: केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात गंभीर तक्रार केली आहे. राहुल गांधी यांनी वारंवार सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचे सीआरपीएफने नमूद केले आहे.
नेमकं प्रकरण काय?
सीआरपीएफच्या तक्रारीनुसार, राहुल गांधी यांनी गेल्या 9 महिन्यांत 6 वेळा परदेश दौरे केले, मात्र त्याबाबत कोणतीही पूर्वकल्पना सुरक्षा यंत्रणांना दिली नाही. त्यांनी इटली, व्हियतनाम, दुबई, कतार, इंग्लंड आणि मलेशिया या देशांना भेट दिली. अशा अचानक झालेल्या दौऱ्यांमुळे त्यांना मिळणाऱ्या Z+ श्रेणीच्या सुरक्षेत अडथळे निर्माण होतात, असा मुद्दा पत्रात मांडण्यात आला आहे.
सुरक्षा धोक्यात?
राहुल गांधी यांना केंद्र सरकारकडून Z+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. या श्रेणीत असलेल्या व्यक्तींनी आपल्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासाची माहिती किमान 15 दिवस आधी सुरक्षा यंत्रणांना देणे बंधनकारक आहे. पण राहुल गांधी यांनी हा नियम पाळला नसल्याचा सीआरपीएफचा आरोप आहे.
सीआरपीएफने स्पष्ट केले आहे की, प्रोटोकॉल न पाळल्यास त्यांची सुरक्षा यंत्रणा कमजोर पडते आणि संभाव्य धोका वाढतो.
पत्रातील तपशील
सीआरपीएफचे व्हीव्हीआयपी सुरक्षा प्रमुख सुनील जून यांनी बुधवारी काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांना अधिकृत पत्र पाठवले. पत्रात नमूद केले की, राहुल गांधी हे एक संवेदनशील आणि महत्त्वाचे नेते असूनही, त्यांनी सुरक्षा प्रोटोकॉल गांभीर्याने घेतलेला नाही.
त्यांचे परदेश दौरे –
- 30 डिसेंबर ते 9 जानेवारी : इटली दौरा
- 12 ते 17 मार्च : व्हियतनाम दौरा
- 17 ते 23 एप्रिल : दुबई दौरा
- 11 ते 18 जून : कतार दौरा
- 25 जून ते 6 जुलै : लंडन दौरा
- 4 ते 8 सप्टेंबर : मलेशिया दौरा
या सर्व दौऱ्यांची माहिती सुरक्षा यंत्रणांना न दिल्याचा उल्लेखही पत्रात आहे
सीआरपीएफच्या या पत्रामुळे काँग्रेस पक्षात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राहुल गांधींनी सुरक्षा प्रोटोकॉल गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे. आगामी काळात काँग्रेस पक्ष यावर काय भूमिका घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.