Gauri Visarjan 2025 : २ सप्टेंबर रोजी गौराईला निरोप; जाणून घ्या यंदाचा शुभ मुहूर्त व पारंपरिक पद्धत!

Gauri Visarjan 2025 : २ सप्टेंबर रोजी गौराईला निरोप; जाणून घ्या यंदाचा शुभ मुहूर्त व पारंपरिक पद्धत!

Gauri Visarjan 2025 : २ सप्टेंबर रोजी गौराईला निरोप; जाणून घ्या यंदाचा शुभ मुहूर्त व पारंपरिक पद्धत

महाराष्ट्रात गौरीपूजनाचा उत्सव हा घराघरांत थाटामाटात साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने माहेरपणाला आलेल्या गौराईचे स्वागत अतिशय पारंपरिक व आनंदमय वातावरणात केले जाते. गौराईचे आगमन, पूजन आणि विसर्जन – हा तीन दिवसांचा सोहळा प्रत्येक घरात भक्तीभावाने पार पडतो.

गौरी आगमन व पूजन

यंदा गौरीचे आगमन ३१ ऑगस्ट 2025 रोजी झाले. आगमनानंतर दुसऱ्या दिवशी गौरीपूजन आणि हळदीकुंकू कार्यक्रम पार पडतो. या दिवशी महिलावर्ग देवीला साड्या, दागिने, हळद-कुंकू अर्पण करतात. देवीला पान-सुपारी अर्पण केली जाते. पारंपरिक पद्धतीनुसार पंचपक्वान्नांचा नैवेद्यही दाखवला जातो.

गौरी विसर्जन पद्धत

गौरी पूजन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते. विसर्जन पद्धती प्रत्येक घराघरात थोड्या वेगळ्या असल्या तरी सर्वत्र भक्तिभाव एकसारखाच दिसतो.

  1. विसर्जनाच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून गौरीची पूजा केली जाते.
  2. देवीला दहीभात, खीर, करंज्या किंवा कान्होल्या यांचा नैवेद्य दाखवला जातो.
  3. वाणाची पाच ताटे केली जातात व देवीला हळदीकुंकू वाहिले जाते.
  4. त्यानंतर स्त्रिया गौराईचे मुखवटे हातात घेतात आणि घराच्या दारापर्यंत कुंकवाचे हात उमटवतात.
    • या पद्धतीमागे श्रद्धा आहे की गौराई घरात सौभाग्य, सुख-समृद्धी आणि आशीर्वाद देऊन जातात.
  5. शेवटी शुभ मुहूर्तावर देवीचे मुखवटे किंवा दगडाचे स्वरूप वाहत्या पाण्यात विसर्जित केले जाते.

गौरी विसर्जनाचा शुभ मुहूर्त 2025

  • गौरी आगमन: ३१ ऑगस्ट 2025
  • गौरी पूजन: १ सप्टेंबर 2025
  • गौरी विसर्जन: २ सप्टेंबर 2025
  • शुभ मुहूर्त: रात्री ९:५० वाजेपर्यंत

भक्तगण या वेळेच्या आत गौराईचे विसर्जन करू शकतात. परंपरेप्रमाणे रात्री उशिरा विसर्जन टाळणे श्रेयस्कर मानले जाते.

गौरी विसर्जनाचे महत्त्व

गौराईचे विसर्जन करताना स्त्रियांच्या डोळ्यांत पाणी येते. कारण या देवीचे आगमन माहेरपणाला आलेल्या मुलीप्रमाणे असते. दोन दिवसांच्या पाहुणचारानंतर तिला निरोप देताना वातावरण भावनिक होते. असे मानले जाते की गौराई घरातील कलह, संकटे दूर करून आनंद, सुख आणि समृद्धीचे वरदान देऊन जातात.

गौरी विसर्जन हा फक्त धार्मिक विधी नसून तो कुटुंबातील स्नेह, परंपरा आणि संस्कृती जपणारा सण आहे. भक्तीभावाने केलेले पूजन व विसर्जन हे घराघरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *