माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांचे निधन

अहिल्यानगर > भाजपा चे ज्येष्ठ नेते आणि आमदार संग्राम जगताप यांचे सासरे माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. शिवाजीराव कर्डीले हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. त्यांनी आजतागायत तब्बल सहावेळा आमदार पद भूषवले होते.

शिवाजीराव कर्डीले हे महाराष्ट्रातील प्रभावशाली नेत्यांपैकी एक होते. त्यांनी आजतागायत तब्बल सहा वेळा आमदारपद भूषवले होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी राहुरी तसेच नगर जिल्ह्यात अनेक विकासकामांना चालना दिली.

शिवाजीराव कर्डीले हे नुकतेच दुर्धर आजारातून बरे झाले होते. कर्डीले यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना नगरमधील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र त्यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नगर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. भाजपा आमदार संग्राम जगताप हे कर्डीले यांचे जावई असून, त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शिवाजीराव कर्डीले यांनी आपल्या कारकीर्दीत जनसंपर्क, संघटन आणि विकासकामांमधून ओळख निर्माण केली होती. त्यांनी नेहमीच कार्यकर्त्यांशी जवळीक राखली आणि जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने अहमदनगरच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

शिवाजीराव कर्डीले हे अगोदर दुग्ध व्यावसायिक होते नंतर ते गावचे सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर ते अपक्ष म्हणून आमदारकीसाठी उभे राहिले आणि निवडून आले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरी येथे जाहीर सभा घेतली होती.

शिवाजीराव कर्डीले यांचे निधन हे महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रासाठी मोठा धक्का आहे. जनतेशी असलेले घट्ट संबंध, प्रामाणिक कार्यपद्धती आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे ते सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकले.

1 thought on “माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांचे निधन”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top